ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांकडून पंढरपूरात विठ्ठलास साकडे – उद्धव-राज ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी मागणी

Spread the love

पंढरपूर | अंतरसंवाद न्यूज
राज्यातील राजकीय चर्चांना नवे परिमाण देणारी एक आगळीवेगळी घटना आज पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पाहायला मिळाली. शिवसेना (ठाकरे गट), युवासेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र यावं, यासाठी विठ्ठलास साकडे घातले.

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीसमोर दुग्धाभिषेक करून आणि “राज-उद्धव एकत्र या” अशा आशयाचे बॅनर्स हातात धरून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी कार्यकर्त्यांत विशेष उत्साह दिसून आला आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचीही उपस्थिती होती.

युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी यावेळी बोलताना सांगितले,

> “शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे प्रेरणास्थान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. विचारधारा समान असताना दोन्ही पक्षांनी आता एकत्र यावे, हीच महाराष्ट्राची गरज आहे.”

तर युवासेनेचे रणजित बागल म्हणाले,

> “ठाकरे हा ब्रँड टिकला तरच मराठी माणूस अभिमानाने उभा राहील. उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे एकत्र आले तर हुकूमशाहीविरोधात एक बलाढ्य पर्याय उभा राहील.”

मनसेचे पदाधिकारी आप्पासाहेब कर्चे यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की,

> “मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून आता दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढण्याची वेळ आली आहे. जर राज आणि उद्धव एकत्र आले तर जनतेत प्रचंड आशा निर्माण होईल.”

या उपक्रमामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना जोर चढला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!