धाराशिव :
2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानानंतरही धाराशिव जिल्ह्यातील विविध महसुली मंडळांमध्ये पीकविमा रकमेबाबत मोठी तफावत करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने (दि.03) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक महसुली मंडळांमध्ये महसूल प्रशासनाने 95 ते 100 टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे केले असतानाही काही मंडळांना प्रति हेक्टर 24 हजार रुपये पीकविमा मंजूर झाला, तर काही मंडळांतील शेतकऱ्यांना केवळ 1 हजार ते 3,200 रुपये किंवा 15 ते 20 हजार रुपये इतकीच भरपाई मिळाली. समान परिस्थितीतही विमा कंपनीने वेगवेगळे निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडी व मित्र पक्षांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या:
धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांतील शेतकऱ्यांना तेर व जागजी मंडळांप्रमाणे प्रति हेक्टर 24,000 रुपये पीकविमा मंजूर करावा.
दरवर्षी होणाऱ्या पंचनामे व पीक कापणी प्रयोगासाठी एकसमान व पारदर्शक निकष निश्चित करावेत.
पीकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने पुनर्पडताळणी करून अन्याय दूर करावा.
यावेळी उपस्थितांनी इशारा दिला की, शासनाने व विमा कंपनीने शेतकऱ्यांवरील हा अन्याय तात्काळ दूर करून सर्वांना समान पीकविमा न दिल्यास महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने जिल्हाभर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील शिवसेना पक्षाचे मकरंद राजे निंबाळकर यांच्यासह काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर ॲड. मनीषा पाटील,राजेंद्र शेरखाने,खलील शेख, प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे, तुषार वाघमारे,धनंजय राऊत,शिवाजी गायकवाड, मिलिंद गोवर्धन, भाई धनंजय पाटील,आयुब पठाण, मेहबूब पटेल, विनोद वीर, अझहर पठाण,सरफराज काझी,ॲड.जावेद काझी, हरिदास शिंदे, ॲड. गणपती कांबळे,अंकुश पेठे, सत्तार शेख,अभिमान पेठे, महावीर चव्हाण,शैलेश दाने, मन्सूर सय्यद, अयाज शेख, संतोष घोरपडे,पंकज भोसले, सुनील आंबेकर,ॲड. योगेश सोन्ने, ॲड.अविनाश जाधव, रणवीर इंगळे,संजय भोरे, मिलिंद पेठे, सर्फराज कुरेशी,सईद काझी,मुशर्रफ सय्यद, इस्माईल शेख तसेच महाविकास आघाडी व मित्र पक्ष यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.