धाराशिव बसस्थानकाचे उद्घाटन अपूर्ण कामातच; दोन दिवसांतच चिखलाचे साम्राज्य, प्रवासी त्रस्त

Spread the love

धाराशिव ( पठाण सलीम ) – धाराशिव शहरातील नव्या बसस्थानकाचे उद्घाटन १ मे रोजी परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र, अवघ्या १६ दिवसांतच या बसस्थानकाची वास्तविकता समोर आली आहे. पावसाच्या दोन सरींमध्ये संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.

उद्घाटनाच्या आधीच अनेक अपूर्ण कामांसह बसस्थानक कार्यान्वित करण्यात आले. लाईट फिटिंग, पंखे, दरवाज्यांची दुरुस्ती, परिसराची स्वच्छता व अनेक लहान-मोठी कामे अद्याप प्रलंबित आहेत. उद्घाटनावेळी प्रशासनाकडून “फक्त रस्त्याचे काम बाकी आहे” असा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात अनेक मूलभूत सुविधा अपूर्ण अवस्थेत आहेत.

१५ व १६ मे रोजी झालेल्या पावसात या बसस्थानकाचे संपूर्ण रूप उघड झाले. छतांवरून गळती, बसस्थानक परिसरात पाणी व चिखल साचल्यामुळे प्रवाशांना चिखल तुडवत बसपर्यंत पोहोचावे लागले. महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रवासी वर्ग या गैरसोयींमुळे संतप्त झाला आहे.

धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून परिवहन मंत्री लाभल्याने नागरिकांमध्ये अपेक्षा होत्या की बसस्थानक आधुनिक आणि आदर्श ठरेल. मात्र, घाईघाईत उद्घाटन करून अपूर्ण कामांमुळे नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे.

संबंधित प्रशासन व ठेकेदार यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!