डॉ. पदमसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांची भावनिक पोस्ट: “सदैव वाहणारा माणुसकीचा झरा”

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी
माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट लिहून त्यांच्याशी असलेलं नातं उलगडून दाखवलं आहे. “सदैव वाहणारा माणुसकीचा झरा” या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या आठवणी शेअर करत डॉ. पाटील यांचे व्यक्तिमत्व, त्यांची कार्यशैली आणि माणुसकीचा सहवास शब्दबद्ध केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये 1989-90 च्या काळापासून डॉक्टर साहेबांशी असलेली जवळीक, त्यांचं नेतृत्त्व, त्यांची राजकारणातील भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्यातील सच्चेपणा यावर भर दिला आहे.
शरद पवार यांच्यावरील निष्ठा, पक्ष संकटात असताना घेतलेली भूमिका, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील घडामोडी, बाबरी मशीद प्रकरण आणि ठाण्याच्या पाणीप्रश्नी दाखवलेला पुढाकार यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला.

त्यांनी लिहिलं की, “तेव्हाचे महासचिव जे साहेबांच्या विरोधात होते, त्यांनी फोन उचलताना डॉक्टर साहेबांनी तो फोन त्यांच्या तोंडावर लगावला” – अशा शब्दांत त्यांनी त्यांचा तीव्र आणि स्पष्टवक्ता स्वभाव अधोरेखित केला.

ठाण्यातील धरणाच्या मागणीसाठी बालहट्ट करणाऱ्या आव्हाड यांच्या मागणीकडे डॉक्टर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन धरणाचे हस्तांतरण ठाणे महापालिकेला करण्याचा निर्णय घेतला होता, हे ही त्यांनी नमूद केलं आहे.

डॉ. पाटील यांची आईप्रती असलेली भक्ती, तिला दररोज पाठीवरून उचलून खाली आणून फिरायला नेण्याची सवय — याबाबतची आठवण शेअर करत आव्हाड म्हणतात की, “इतक्या मोठ्या नेत्याकडे असं मातृभक्त मन हेच त्यांचं खऱ्या अर्थानं ‘डॉक्टर’ असणं दाखवतं.”

पोस्टच्या शेवटी ते म्हणतात की,
“आजही मुंबईत काहीही राजकीय हालचाल झाली, की सकाळी सहाला डॉक्टर साहेबांचा फोन येतोच. त्यांच्या मनातलं साहेबांविषयीचं प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसून येतं. त्यांनी शतकवीर व्हावं, हीच मनापासून इच्छा.”

जितेंद्र आव्हाळे यांची फेसबुक पोस्ट खालील प्रमाणे..

हा लेख प्रेमळ डॉक्टर साहेबांसाठी…सदैव वाहणारा एक नितळ खळखळणारा माणुसकीचा झरा

सन 1989-90 चा काळ होता. माझी डॉक्टर साहेबांशी ओळख कशी व कुठे झाली हेच मला आठवत नाही. कारण त्यांनी मला इतक जवळ केले कि, जणू काही मी त्यांच्या घरातलाच. निष्ठा काय असते हे खरतंर मी त्यांच्याकडूनच शिकलो.
आपला नेता जे सांगेल ती लक्ष्मणरेषा….

सन 1991 साली श्री. शरद पवार साहेबांविरुद्ध महाराष्ट्रात काही जणांनी बंड केले.
त्या बंडाला सामोरे जाताना मी त्यांना बघितले….
एखाद्या कार्यकर्त्याने जे करावं ते डॉक्टर साहेब करत होते. आपल्या वयाचा विचार न करता त्यांच वागण मी स्वत:च्या डोळ्याने बघीतले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा हात पकडून फक्त दाबला तर त्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला गेला असेल याचा विचार आपणच करावा…
तेव्हाचे एक महासचिव जे या बंडात साहेबांच्या विरोधात होते ते एका कॅबिनमध्ये बसले असता फोन खणखणला. फोन जवळ डॉक्टर साहेब बसले होते. दोघांचाही हात फोन उचलायला गेला. डॉक्टरांनी फोन तर उचललाच, पण उचलता उचलता तो फोन त्या नेत्याच्या तोंडावर बसला.. ते कस झाले असेल ते तुम्हीच समजून घ्या.

श्री. शरद पवार साहेब संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. जाताना इथे मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा सुरु झाली. श्री. शरद पवार साहेबांच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते कि डॉक्टर साहेबांनी मुख्यमंत्री व्हाव. मला त्यावेळस हे गट तट काही माहितीच नव्हते. पण, त्यांच्या जवळ असल्य़ाकारणाने मलाही वाटत होते कि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं… तसे त्यांनी संध्याकाळी मला सांगितले देखील कि, सकाळी लवकर ये आपले नाव होईल अस वाटतय. पण, नंतर जे काही झाले ते वेगळेच होते. आणि श्री. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. सुधाकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यानंतर राजकारणाला वेगळं वळण लागले आणि परत एकदा डॉक्टर साहेब हे शरद पवार साहेबांसाठी सक्रिय झाले.

डॉक्टर साहेब आणि श्री. सुधाकरराव नाईक यांच्यामध्ये दुरावा कायम होता. त्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. रणजीत देशमुख हे होते.
प्रणवकुमार मुखर्जी, श्री. जी. के. मुपनार आणि श्री. जनार्दन पुजारी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. ह्या दोघांना भेटायला हायमाऊंट या शासकीय विश्रामगृहात श्री. सुधाकरराव नाईक आले. सुधाकरराव नाईक यांच्या जमावाने श्री. शरद पवार साहेबांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली असता तिथे आमची झटापट झाली.
मी आणि श्री. मदन बाफना आम्ही दोघेच त्या ठिकाणी उपस्थित होतो. झटापटीमध्ये श्री. सुधाकरराव नाईक यांना धक्का लागला आणि ते खाली पडले. ही तक्रार श्री. सुधाकरराव नाईक यांनी श्री. प्रणवकुमार मुखर्जी व श्री. जी. के. मुपनार यांच्याकडे केली. तिथून काही अंतरावर राहत असलेल्या डॉक्टर साहेबांना लगेच बोलाविण्यात आले. डॉक्टर साहेब आले आणि जाताना मला आणि श्री. मदन बाफनांना विचारले काय झाले ?
आम्ही सर्व सविस्तर सांगितले. ते वरुन खाली आले आणि आमच्याकडे बघून हसले. तेवढ्यात मुंबई पोलीसांची गाडी आली. त्या गाडीमधील एकाने उतरून मला बोलावले. माझे नशीब चांगले कि, त्याचवेळेस डॉक्टरसाहेब खाली आलेले होते. मला पोलीस बोलवत आहेत हे बघितल्यानंतर ते स्वत:च पुढे आले आणि विचारले काय झाले. पोलीसांनी सांगितले कि आम्हांला यांना चौकशीसाठी न्यायचे आहे. त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये सांगितले. ह्या घरातल्या भांडणात तुमचे काही काम नाही चला जा…त्यांनी मला सांगितले गाडीत बस आणि मला स्वत:च्या निवासस्थानी घेऊन गेले…
त्यानंतर बरीच वर्षे आम्ही त्यांच्या सानिध्यात काम केलं आहे. ते जेव्हा पाटबंधारे विभागाचे मंत्री होते. तेव्हा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मी त्यांच्याकडे हट्ट धरला. तेव्हा माझा बालहट्ट हो बालहट्टच होता तो कारण मला वाटायचं की आपल्या ठाण्याला आणि ठाणेकरांना स्वतःच्या हक्काच धरण आणि पाणी मिळावं…माझा हट्ट
पूर्ण करण्यासाठी म्हणून मुंबईला देण्यासाठी 1952 साली चितळे आणि गोडबोले आयोगाने Notified (सुचविलेले) धरण हे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नावावरुन काढून घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या नावावर केले…
हे धरण झाल तर 2040 पर्यंत ठाण्याचा पाणी प्रश्न मिटेल अशी परिस्थिती त्यावेळेस होती. त्यांनी कुठलेले आडेवेडे न घेता ते धरण ठाणे महानगरपालिकेला देऊ केले अर्थात त्यानंतर शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये थोडेसे समज गैरसमज होत गेले आणि महापालिकेने ते धरण करण्यास नकार दिला आणि  इतकी मोठी मोठी पद मिळूनही ठाण्याला आजही स्वतःचे हक्काचे पाणी नाही…

अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याबद्दल सांगता येतील. पण, त्यांच्या सानिध्यातील दिवस हे कधीच विसरता येणार नाहीत. राष्ट्रपती बाजूला उभे आहेत. बाजूला श्री. शरद पवार साहेब उभे आहेत….दोघेही विमानतळावरती आहेत आणि डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्या बाजूलाच उभे राहून मी बाहेर गर्दीत उभा असतांना पटकन ओरडून म्हणाले ‘बंटी आतमध्ये ये’ हे मी कधीच विसरणार नाही. मला आजही आठवते कि, 9 मे 1991 रोजी मी औरंगाबाद येथे होतो.राजीव गांधी हे औरंगाबादला प्रचारासाठी आले होते. आतमध्ये राजीव गांधी, राजीव गांधी यांचे मित्र सुमन दुबे, श्री. शरद पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री. निलंगीकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे आतमध्ये बसलेले होते. पटकन बाहेर एक पोलीस धावत आला आणि माझ्या कानात येऊन म्हणाला तुम्हांला आतमध्ये बोलावले आहे. आतमध्ये डॉ. साहेबांनी मला बोलावून घेतले आणि जवळ-जवळ 1 तास राजीव गांधी यांच्याबरोबर श्री. शरद पवार साहेब गप्पा मारत असतांना मी शांतपणाने हे सगळं बघत होतो. हे सगळं केवळ डॉक्टर साहेबांमुळेच माझ्या आयुष्यात घडले. इतका मनाने मोठा, निर्मळ माणूस माझ्या आयुष्यात आला हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांचे चालणे, त्यांची व्यायामाची छाती हे सगळे त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेसे होते.

हे सगळं असताना देखिल त्यांची मातृभक्ती ही वाखणण्याजोगी होती. एवढा मोठा कॅबिनेट मिनिस्टर, त्यांचा संपूर्ण राजकीय वर्तुळातील दरारा हे सगळं असताना त्यांच्या आईला ते दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आई तिसऱ्या माळ्यावर भावाबरोबर राहायची. डॉक्टर साहेब तीला स्वतःच्या पाठीवर उचलून घेऊन खाली आणायचे. आणि फिरायला घेऊन जायचे व परत उचलून घेऊन घरी आणून सोडायचे. हे सगळ एका माणसाच्या व्यक्ती चारित्र्यामध्ये असणं ह्याच मला आश्चर्यच वाटत.

त्यांच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांची दहशत तर होतीच. पण, स्वकियांबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त भिती होती. मला खरतर श्री. शरद पवार साहेब यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली त्यांना मी कधीही विसरु शकत नाही. एक म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी.

आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे. थकलेले डॉक्टर साहेब यांचा आवाज ऐकला कि, मन अस्वस्थ होतं. आजही मुंबईला कुठलिही राजकीय हालचाल झाली कि, सकाळी 6 ते 7 च्या मध्ये त्यांचा फोन येणार आणि परिस्थितीबद्दल विचारणा करणार. त्यांच्या मनातलं साहेबांविषयीचे प्रेम हे त्यांच्या प्रत्येक शब्दांत आजही दिसून येते. त्यांची प्रकृती ठणठणीत राहो आणि ते शतकवीर होवो ह्याच शुभेच्छा ! कारण आजच्या जगात अशी माणसे फार कमी आढळतात.

आपला सदैव नम्र

आपलाच बंटी

जितेंद्र आव्हाड


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!