शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यात व्यापक लढा – आ.कैलास पाटील

Spread the love

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला वठणीवर आणण्यासाठी व्यापक लढा उभारला जाणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या वेळी राजकीय मतभेद व भूमिका बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला.

बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी-बियाणे या गंभीर मुद्द्यांसह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर सरकार चालढकल करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. परिणामी, चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचेही नेत्यांनी नमूद केले.

या विश्वासघातकी सरकारविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. तर राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन माध्यमातून या परिषदेत सहभागी झाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!