विकास कामांच्या निधीचे समान वाटप करा ,जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची कैलास शिंदे नी मुख्यमंत्र्याकडे केली मागणी

Spread the love

उमरगा : जिल्हा समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचे समान वाटप करावे. कामांचे वाटप करताना जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला. आमदार सत्ताधारी पक्षाचे नसल्यामुळे निधीचे वाटप करताना उमरगा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, असे शिंदे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. २००९ पासून उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. युती असल्यामुळे भाजपला या मतदारसंघातून संधी मिळाली नाही.
राज्यात भाजपची सत्ता असूनही उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला आहे. शक्तीशाली आमदार बहुतांश निधी आपापल्या मतदारसंघांत नेतात. त्यामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघ वंचित राहू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसतानाही प्रामाणिकपणे, झोकून देऊन पक्षाचे काम करणारऱ्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. निधी आला तरच विकाकामे होतील, लोकांची सोय होईल. याचा पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ २०२९ मध्ये खुला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपला या मतदारसंघातून संधी आहे. विकासकामांच्या बळावर भाजप तळागाळात पोहोचू शकेल. याचा विचार करून जुन्या, निष्ठांवत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, त्यांना बळ द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!