धाराशिव जिल्ह्यात ११ वी प्रवेश प्रक्रिया यंदापासून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने , शिक्षण विभागाचे आवाहन

Spread the love

धाराशिव : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ११ वीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. याआधी केवळ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रांमध्येच ही प्रक्रिया लागू होती. मात्र आता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागांतील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया सक्तीने लागू करण्यात आली आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात जिल्हास्तरावर अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांकडून विहित नमुन्यात माहिती संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालक, विद्यार्थी आणि शाळांना या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती असणे अत्यावश्यक आहे.

विद्यालयांची तयारी गरजेची

सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी शासनाच्या संकेतस्थळावर संस्थेची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी इंटरनेट सुविधा, आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी, तसेच विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन व्यवस्था विद्यालयांनी करणे गरजेचे आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शासन मान्यता आदेश, शाखा व विषय मान्यता, अल्पसंख्याक प्रमाणपत्र, बँक डिटेल्स आणि शुल्क संबंधी कागदपत्रे आधीच तयार ठेवावी लागतील.

विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया कशी असेल?

विद्यार्थ्यांनी दोन टप्प्यांत नोंदणी करावी लागेल — इयत्ता १० वीचा निकाल लागण्यापूर्वी आणि नंतर. अर्ज दोन भागांत भरायचा असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की गुणपत्रक, टी.सी., जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र, आधारकार्ड, फोटो वगैरे तयार ठेवणे गरजेचे आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थी मोबाईल किंवा त्यांच्या शाळेतील मदतीने अर्ज करू शकतात.

प्रवेशासाठी एकूण चार फेऱ्या असतील. पहिली फेरी ‘शून्य फेरी’ असेल जी केवळ पूर्वतयारीसाठी असेल. राखीव कोटे आणि द्विलक्षी अभ्यासक्रमांसाठी देखील स्वतंत्र नोंदणी गरजेची आहे. प्रवेश ही संबंधित प्रवर्गानुसार – अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, आर्थिक दुर्बल घटक, इ. आरक्षणानुसार दिली जाणार आहे.

प्रशासनाकडून आवाहन

शासनाच्या ऑनलाईन प्रवेश संकेतस्थळावर वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या वेळापत्रक व सूचना यांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीने दिलेले प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. पालक, विद्यार्थी, प्राचार्य व शाळा व्यवस्थापन यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. यासंदर्भात तालुका व जिल्हास्तरावर लवकरच मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!