खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका अधिकाऱ्यांचे कौतुक केलं हे पहिल्यादा समोर आले आहे – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Spread the love

धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 1 मे रोजी जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक पार पडली. यानंतर कृषी विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माने यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले, “खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा होणे आवश्यक आहे. महाबीजच्या बियाण्यांची मागणी आधीच पाठवावी आणि बोगस खत विक्री रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी.” त्यांनी शेतकऱ्यांना खत तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.

या बैठकीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सीईओ डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

खासदार निंबाळकर यांनी कृषी विभागाने पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज अधोरेखित केली. “शेतकरी केळी लागवडीकडे वळावे, त्यासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे,” असे त्यांनी सांगितले. हे बोलताना त्यांनी रवींद्र माने यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, “खासदार ओमराजेंनी अधिकाऱ्याचं कौतुक केलं हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं.”

या बैठकीत सन 2024-25 मधील विविध योजनांची माहिती देताना माने यांनी सांगितले की, फळबाग लागवड, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेतबांध प्रयोगशाळा, भांडार उभारणी, घरगुती बियाण्यांचा वापर यासारख्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात काम झाले आहे.

श्री. माने यांनी पर्जन्यमान, अतिवृष्टी अहवाल, खत साठा, ऊस पिकातील तंत्रज्ञानाचा वापर, ॲग्रीस्टॅक नोंदणी, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची आकडेवारी सादर केली. त्यावर समाधान व्यक्त करत पालकमंत्री व खासदारांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!