जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?

Spread the love

धाराशिव : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व स्पष्ट होताना दिसत आहे. मॅजिक फिगरसाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा अधिक सदस्य सध्या महायुतीसोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे.


सध्या कोकण सहलीवर असलेल्या भाजप आणि महायुतीच्या ३१ सदस्यांची भेट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांनी घेतली. या भेटीत आगामी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सर्व सदस्यांनी एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


दरम्यान, महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने शिंदे सेनेतील एका गटाने सत्ता स्थापनेचा दावा केल्याची चर्चा सुरू होती. मात्र महायुतीकडे आवश्यक संख्याबळापेक्षा अधिक सदस्य असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या दाव्यातील हवा निघाल्याचे बोलले जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी काही सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संपर्कात असून अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे. एकूण ५५ सदस्यांपैकी तब्बल ३८ सदस्य अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या बाजूने ठाम असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. तर तीन सदस्य ऐनवेळी आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे.


अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, महायुतीची ताकद पाहता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या अधिकृत प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!