“पत्राचा आधार नाही, निर्णयाचा ठसा नाही – माध्यमांना रोखणारे नेमके कोण?” , जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयाचा अभाव; खडसे यांच्यावर जिल्हाधिकारी खडसावले

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी देखील पत्रकारांना बैठकीतून रोखण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, माध्यमांना प्रवेश द्यावा. मात्र, यंदाही त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याने हा आदेश कुठे गडबडला, हे समजत नाही.

सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप गटात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या संदेशात माध्यमांना बैठकीत प्रवेश नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यानंतर झालेल्या ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री सरनाईक यांना या निर्णयाबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी “माध्यमांना कोणी रोखले?” असा सवाल करत आश्चर्य व्यक्त केले आणि तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात विचारणा केली.

या वेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनाही या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यांनी लगेचच माहिती अधिकारी खडसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. खडसे यांनी मात्र स्पष्टीकरण देताना सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या एका पत्राच्या आधारेच त्यांनी हा संदेश पाठवला होता. या गोंधळात काही वेळातच पुन्हा एक नवीन संदेश पाठवून माध्यमांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले.

मात्र, खरा प्रश्न असा आहे की, जर जिल्हाधिकारी यांनाच या पत्राबाबत माहिती नसेल, तर ते तयार कोणी केले? आणि माध्यमांना रोखण्याचा अधिकार कोणी वापरला? याचे उत्तर अद्यापही मिळालेलं नाही.

या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनातील समन्वयाचा अभाव या प्रकारामुळे पुन्हा एकदा उघड झाला असून, अशा प्रकाराला आळा बसावा, यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तो ‘शुक्राचार्य’ कोण?

धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवसापासून शुक्रचार्य हा शब्द गाजत आहे अशा पत्रकारांना डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बसून देण्यासाठी प्रयत्न करणारा तो शुक्रचार्य कोण? या सर्व गोंधळामागे खरा सूत्रधार कोण होता, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!