धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे

Spread the love

मराठवाड्यातील जुन्या पिढीच्या आठवणींमध्ये दोन गोष्टी आजही विशेष जिवंत आहेत लातूरची प्रसिद्ध डालडा फॅक्टरी आणि बार्शी लाईट रेल्वे, म्हणजेच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी “देवाची गाडी”. १८९७ साली सुरू झालेली ही नॅरोगेज रेल्वे सुरुवातीला बार्शी ते कुर्डूवाडी धावत होती. पुढे विस्तार होत जाऊन १९२७ पर्यंत लातूर ते मिरज असा तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास ती करू लागली. १८९५ मध्ये पंढरपूर येथे रेल्वेस्थानक उभारल्यानंतर या रेल्वेला “देवाची गाडी” अशी ओळख मिळाली.

काळ बदलत गेला आणि आधुनिकतेच्या वाटेवर नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र या परिवर्तनामध्ये धाराशिव जिल्ह्याला एक वेगळे स्वप्न होते. रेल्वे फक्त जिल्ह्याच्या हद्दीतून जाऊ नये, तर ती जिल्हा मुख्यालयापर्यंत यावी, अशी जनतेची अपेक्षा होती. हे स्वप्न साकार करणे सोपे नव्हते. कारण मूळ मार्गावरून तब्बल १८ किलोमीटरचा वळसा घेऊन रेल्वे धाराशिव या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आणावी लागणार होती.

या संघर्षाची पार्श्वभूमी १९७२ च्या भीषण दुष्काळाशी जोडलेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर दुष्काळी कामे सुरू केली. त्याच काळात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी कळंब येथे आल्या आणि त्यांनी लातूर–मिरज ब्रॉडगेजसह चार रेल्वे प्रकल्पांचा उल्लेख जाहीर सभेत केला. परंतु घोषणा आणि प्रत्यक्ष मंजुरी यामध्ये तब्बल २७ वर्षांचा संघर्ष दडला होता.

या रेल्वेमार्गासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात देशातील नॅरोगेज मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. मात्र धाराशिव शहरापर्यंत रेल्वे आणण्याचा निर्णायक टप्पा केवळ माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांमुळेच गाठता आला ही काळया दगडावरची रेघ आहे.

धाराशिव रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले. त्यामध्ये तत्कालीन खासदार अरविंद कांबळे, माजी आमदार कलिमोद्दीन सिद्दिकी, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष तथा पत्रकार नंदकिशोर मंत्री, पत्रकार व्यंकटेश हंबिरे, जीवनराव गोरे, रेवणसिद्ध लामतुरे आदी मान्यवरांचा समावेश होता. या शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्यासमोर धाराशिवच्या रेल्वेची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली.

त्यावेळी सर्वात मोठा अडथळा होता तो रेल्वे बोर्डाचा. नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करताना अतिरिक्त अंतर वाढविण्याचे कोणतेही उदाहरण नव्हते. त्यामुळे येडशी–धाराशिव हा १८ किलोमीटरचा वळसा रेल्वे बोर्डाला मान्य नव्हता. भूसंपादन आणि वाढीव खर्च ही त्यामागील प्रमुख कारणे होती. याच निर्णायक टप्प्यावर डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी राजकीय, प्रशासकीय आणि आपल्या राजकीय मुत्सुदिगिरीची ताकद पणाला लावली. रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार साहेबही उपस्थित होते. बैठकीत रेल्वे बोर्डाचे अधिकारी नकारात्मक भूमिका घेत असताना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा मार्ग जिल्हा मुख्यालयाला जोडला गेल्याने भविष्यात तुळजाभवानी मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्राला अधिक जवळ आणेल, असा मुद्दा ठामपणे मांडला.

देशातील रेल्वेमार्गांचे ब्रॉडगेज करताना जिल्हा मुख्यालय, पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे जोडण्याचा धोरणात्मक निर्णय या मांडणीमुळे अधोरेखित करण्यात आला. अंतर केवळ १८ किलोमीटरने वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रस्तावाला गती मिळाली. अखेर याच बैठकीत रेल्वेमार्गाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि धाराशिवच्या रेल्वे स्वप्नाला नवे पंख लाभले.

यानंतर प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण झाले. १६ फेब्रुवारी १९९३ रोजी रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्या हस्ते लातूर–कुर्डूवाडी रेल्वे रुंदीकरणाचा शुभारंभ झाला. ३१ डिसेंबर २००३ रोजी लातूर–लातूर रोड या महत्त्वाच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. अखेर २६ सप्टेंबर २००७ रोजी धाराशिव लोहमार्गाचे उद्घाटन झाले आणि १९ ऑक्टोबर २००८ रोजी पहिली लातूर–मुंबई रेल्वेगाडी धाराशिव स्थानकात दाखल झाली.

आज धाराशिव जिल्हा रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर ठळकपणे दिसतो. मुंबई, पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, कोल्हापूर आणि देशाच्या विविध भागांशी जोडणारा हा रेल्वेमार्ग हजारो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या यशामागे अनेकांचे योगदान असले तरी धाराशिव शहरापर्यंत रेल्वे आणण्यासाठी नेतृत्व, सातत्य, राजकीय इच्छाशक्ती आणि दिल्लीपर्यंत प्रभावी पाठपुरावा या सर्व बाबींचे श्रेय माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनाच द्यावे लागेल. कारण रेल्वे फक्त रुळांवर धावत नाही; ती स्वप्ने, विकास आणि एका पिढीचा संघर्ष घेऊन धावत असते. धाराशिवच्या रेल्वेच्या इतिहासात डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव त्यामुळे कायम अग्रक्रमाने घेतले जाईल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!