डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर

Spread the love

धाराशिव जिल्हा आज शाश्वत विकासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपला आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम धडाक्यात सुरू आहे. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम त्याच्या दुरुस्तीसाठी मिळाली आहे. कृष्णा खोऱ्याचे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी साठवण्यासाठी तुळजापूरचा रामदरा तलाव सज्ज झाला आहे. 

काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. यंदाच्या हंगामात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसबिलापोटी साखर कारखान्यांकडून तब्बल दोन हजार कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने आणि गूळ पॉवडर कारखान्यांनी या हंगामात विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. सध्या जिल्ह्यातील चालू साखर कारखान्यांची संख्या १६ आहे. गूळ पॉवडर कारखान्यांची संख्या आहे १२. 

वरील दोन्ही विषय व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा कुणी निर्माण केल्या, असा प्रश्न कुणालाही विचारला तर, त्याचे उत्तर येईल- आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेब! डॉक्टर साहेब १९७८ मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले, त्यावेळी जिल्ह्याची अवस्था काय होती, हे कुणाकुणाला माहित आहे? त्यावेळी जिल्ह्यात साखर कारखाने किती होते, नंतर कारखान्यांची संख्या कशी वाढली, कारखान्यांची संख्या वाढली… याचा अर्थ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधली की डॉक्टर साहेबांनी जिल्ह्याचा विकास कसा घडवून आणला, हे सर्वांच्या लक्षात येईल. 

सिंचनाच्या सुविधा वाढल्या, शेतीला पाणी मिळू लागले आणि उसाचे क्षेत्र वाढले! त्यासोबत साखर कारखान्यांची संख्याही वाढली. हे कुणामुळे झाले? अर्थातच आदरणीय डॉक्टर साहेबांमुळे! कृष्णा खोरेचे पाणी, निम्न तेरणा उपसा सिंचन योजना, धाराशिवला रेल्वे आदी कामांची मुहुर्तमेढही आदरणीय डॉक्टर साहेबांनीच रोवली आहे. बार्शीहून सरळ लातूरला जाणारी रेल्वे डॉक्टर साहेबांनी धाराशिवला १८ किमी वळवली. आता ही सर्व कामे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे नेटाने पुढे नेत आहेत. आता आपल्या लक्षात येईल, की आपला जिल्हा मागास असल्याची ओरड निरर्थक आहे, त्याला राजकारणाची किनार आहे. 

आपल्या जिल्ह्यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही. त्यामुळे मोठे उद्योग येत नव्हते. आदरणीय डॉक्टर साहेबांनी उजनी धरणातील पाणी धाराशिवसाठी आरक्षित करून घेतले. ही बाब वाटते तितकी सोपी नव्हती. उजनीचे पाणी धाराशिवला आणण्यासाठी आणि कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी डॉक्टर साहेबांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली. ही दोन्ही कामे झाली, त्यासाठी डॉक्टर साहेबांना किंमत मोजावी लागली. त्यांनी त्याची पर्वा केली नाही. आपल्या भागाचा विकास व्हावा, शेतकरी समृद्ध व्हावेत, लोकांचे जगणे सुकर व्हावे, हे डॉक्टर साहेबांसाठी महत्त्वाचे होते. सिंचनाची कामे झाली, उजनीचा पाणी आले, आता कृष्णा खोऱ्याचेही पाणी येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगही येत आहेत. कौडगाव एआयडीसीत संरक्षण साहित्य उत्पादनाचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे, ही अगदी ताजी घडामोड आहे. 

जिल्ह्याच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठी डॉक्टर साहेबांनी आपली राजकीय कारकीर्द अनेकदा पणाला लावली. ते पाटबंधारे मंत्री असताना, ऊर्जामंत्री असताना संबंधित कामांसाठी जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळत असे. त्यामुळे डॉक्टर साहेबांनी विरोधकांसह स्वपक्षीयांचीही नाराजी अनेकवेळा ओढवून घेतली. मंत्रि‍पदावर असताना डॉक्टर साहेबांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे पाण्याचा शाश्वत स्त्रोत नसलेला आपला जिल्हा आज ताठ मानेने प्रगतीच्या मार्गावर कूच करत आहे. 

डॉक्टर साहेबांचे राजकारण शून्यातून सुरू झाले. सामान्य नागरिकांमध्ये वाढलेल्या डॉक्टर साहेबांना त्यांच्या समस्यांची जाणीव अगदी सुरुवातीपासूनच होती. शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात, त्यांच्या गरजा काय आहेत, हे त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. त्यामुळे पाटपबंधारे मंत्री, ऊर्जामंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची असंख्य कामे केली. अनेक सिंचन प्रकल्पांची उभारणी केली, जिल्हाभरात वीज उपकेंद्रांचे जाळे विणले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचले, वीजही पोहोचली. 

माणूस हा डॉक्टर साहेबांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, मग तो आपला आहे की राजकीय विरोधक, हे डॉक्टर साहेबांसाठी गौण असायचे. त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येकाचे काम त्यांनी केले. डॉक्टर साहेबांची प्रतिमा सिंहासारखी आहे. असे असले तरी डॉक्टर साहेबांचे मन अत्यंत कनवाळू आहे. आपल्याकडे कामासाठी मुंबईला येणाऱ्या लोकांची ते पुरेपूर काळजी घ्यायचे. मंत्री असलेले डॉक्टर साहेब वेळप्रसंगी लोकांसोबत अन्य विभागांत जाऊन त्यांची कामे करून द्यायचे. जीवनात चढ-उतार येतच असतात. त्याला डॉक्टर साहेबही तरी अपवाद कसे राहतील? काही कठीण प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. 

आज आपल्या जिल्ह्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांना महायुती सरकारकडून मिळालेल्या पाठबळामुळे शाश्वत विकासाची अनेक कामे सुरू आहेत. यापैकी सिंचनाच्या कामांची मुहूर्तमेढ डॉक्टर साहेबांनी रोवली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून धाराशिवला आता रेल्वेचे जंक्शन होणार आहे. डॉक्टर साहेबांमुळेच धाराशिवला पहिल्यांदा रेल्वे आली, हे उल्लेखनीय आहे.  

पाण्याचा शाश्वत स्त्रोत माही म्हणून उद्योग आले नाहीत, मग करायचे काय? शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये करण्यासारखे खूप काही होते आणि डॉक्टर साहेबांनी ते केले. त्यामुळेच साखर कारखान्यांची संख्या वाढली, सिंचनाखालील शेती वाढली, उस, फळबागांचे क्षेत्रही वाढले. ही किमया साधणाऱ्या डॉक्टर साहेबांचा आज (१ जून) वाढदिवस आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!