धाराशिव : जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनी, प्लॉट आणि घरांच्या वर्ग-१ प्रक्रियेत महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या कथित अडवणुकीविरोधात शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक झाले आहेत. हजारो प्रकरणे प्रलंबित राहिल्याने जमीन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही महसूल विभागाकडून वर्ग-२ जमिनी व प्लॉट वर्ग-१ करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही होत नाही. रहिवासी वापरातील प्लॉट आणि घरांना शासनाने सवलत जाहीर केली असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये शासन आदेशात नसलेली अतिरिक्त कागदपत्रे मागवून फाईली महिनोनमहिने प्रलंबित ठेवल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भूसंपादन विभाग, अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि सामान्य प्रशासन विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचाही गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
शेतकरी व प्लॉटधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये सर्व वर्ग-२ प्रकरणे ई-ऑफिस प्रणालीद्वारे निश्चित मुदतीत निकाली काढणे, प्रत्येक पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेणे, विशेष शिबिरे आयोजित करून प्रकरणे मार्गी लावणे तसेच मुद्दाम फाईली प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सेवा हमी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर उमेश राजेनिंबाळकर,अमित राजेनिंबाळकर,सुभाष पवार, खलील सय्यद,ललित चौधरी,अर्जुन पवार,अजिंक्य राजेनिंबाळकर,आनंद जगदाळे,अनिरुद्ध कावळे,अमरसिंह जगदाळे,सागर देशमुख,अमित राजगुरू, ॲड.रणजीत वाकुरे,ॲड,किरण बावळे,ॲड. बळीराम लोमटे,ॲड.आनंद फाटक,ॲड प्रशांत कस्तुरे,सुनिल महाजन, अभिजीत पवार, संजय पवार, अतुल महाजन,अमजद तांबोळी, निलेश वाघमारे, प्रसाद राजे, राजेश बांगड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.