मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Spread the love

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

जिल्हाध्यक्षांचे काम चांगले असेल त्यांना पुन्हा संधी मिळणार! – राजेश तिवारी

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात यासाठी संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक बुथ स्तरावर जाणार असून जनतेच्या समस्या काय आहेत ? ते समजून घेण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक वाडी वस्ती आणि गाव तांडा या ठिकाणी पोचणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करतील. काँग्रेसचे जाळे सर्व स्तरावर मजबूत आहे. मात्र, भाजपने ईडी, सीबीआय व एसआयआर आदींची भीती दाखवण्यासह लालच दाखवून तसेच जाती धर्माच्या नावावर भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करत आहे. मात्र जनता काँग्रेस सोबत असून आगामी काळात जनताच केंद्रातील मोदी सरकारला मुळासकट उखडून फेकणार असल्याचा ठाम दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेश प्रभारी तथा धाराशिव प्रभारी राजेश तिवारी यांनी करीत केंद्रातील भाजप सरकारवर दि.११ एप्रिल रोजी हल्लाबोल केला.

धाराशिव शहरातील जिल्हा रुग्णालय शेजारील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे संघटन सृजन अभियान संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव निरिक्षक हेमंत ओगले, प्रदेश महासचिव तथा धाराशिव निरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड,
प्रदेश सचिव उदयसिंग पाटील, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, डॉ. स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, पांडुरंग कुंभार, विनोद वीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभर केली. ही यात्रा ६ हजार किलो मीटरपेक्षा जास्त करण्यात आली असून या माध्यमातून खा गांधी यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून समजून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीसगड येथे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एससी, एसटी व ओबीसी या वर्गातील नेतृत्वास ५० टक्के नेतृत्व करण्याचा ठराव पारित केला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांच्या काय समस्या आहेत. त्यासंदर्भात सरकार दरबारी आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा, तालुका, गट बूथ स्तरावर जाऊन जनतेचे मत जाणून घेण्यात येणार आहे. यादरम्यान सर्वसामान्य जनता जे मत नोंदविल त्याचा अहवाल दि.१९ एप्रिलपर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीकडे सादर केला जाणार आहे. यामध्ये ५० वर्षावरील व युवक कार्यकर्त्यांना काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांना देखील संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून युवक वर्गाला काम करण्याची संधी आणि जबाबदारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या जिल्हाध्यक्षांचे काम जनतेशी जोडलेले असेल आणि जनतेने त्यांच्या कामावर पसंती दिली तर त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू असून या बांधणीमध्ये अशा अनुभवी जिल्हाध्यक्षाचा पक्षाच्या वाढीसाठी मोठी मदत होणार असल्याचे नमूद करीत ते म्हणाले की, १९ एप्रिलपर्य यासंदर्भात थेट जनसेशी संवाद केला जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!