धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
बुकिंग प्रक्रियेतील अडचणी दूर! दररोजच्या फेऱ्यांमध्येही झाली लक्षणीय वाढ
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) – धाराशिव एस.टी. आगारामध्ये चालक व वाहक यांच्या रिक्त जागांच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या अडचणींवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आगारात १७२ चालक व १९३ वाहक कार्यरत असले आहेत. मात्र, त्यापैकी २० ते २२ चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत विलंब होत होता. अडचणीवर मात करण्यासाठी चालकांच्या ॲडजस्टमेंटसाठी संपर्क साधून कोण कुठे ड्युटी करणार ? याची खातरजमा करावी लागत असल्यामुळे बुकिंग उशिरा पूर्ण होत होते. परंतू, आता ही प्रक्रिया नियमित व सुरळीत करीत दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत बुकिंग पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या आगारातून दररोज ९२ ते ९३ शेड्युल गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट असून त्यातील काही बसेस नादुरुस्त व कामाच्या चढ-उतार यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आगारात एकूण ९० ते ९५ बस असून त्यापैकी दररोज ७५ ते ७८ बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावत आहेत. तसेच, सुटे भाग (सामान) उपलब्ध करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी जाणवत असून त्यावर उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. तसेच दररोज ३६ हजार किलो मीटर अंतर धावण्याचे उद्दिष्ट असलेल्या या आगाराने काही महिन्यांपूर्वी केवळ २८ हजार किलो मीटरपर्यंतच मजल मारली होती. मात्र, नव्याने पदभार स्वीकारलेल्या वाहतूक निरीक्षक यांच्या अनुभवी कार्यक्षमतेमुळे अल्पावधीतच ही संख्या वाढून ३२ ते ३४ हजार किलो मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन लाखो रुपयांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पूर्वी धाराशिव-लातूर मार्गावर दररोज १० ते १२ फेऱ्या होत असताना राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर व विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजघडीला या फेऱ्यांची संख्या १८ ते १९ फेऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होण्याबरोबरच आगाराच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे अडचणी असताना देखील प्रशासनाच्या कुशलयुक्त प्रयत्नांमुळे हे आगार सावकाश परंतू नियोजनबद्ध पद्धतीने स्टेअरिंगच्या माध्यमातून सरळ मार्गाने यशस्वी वाटचाल सुरु आहे.