धाराशिव | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्यात येणार असून, हा उपक्रम टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणप्रणालीशी जोडणे गरजेचे आहे. यासाठी सेमी-इंग्रजी माध्यमाची अंमलबजावणी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी प्रभावी नियोजन करणे, शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच सर्व स्तरांवर समन्वय ठेवून कार्य करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांची बैठक घेण्यात आली. बैठकीत शिक्षकांच्या सूचना, मते जाणून घेतली गेली. सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करण्यास एकमुखी पाठिंबा दर्शविला. हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे मत अध्यक्षा पाटील यांनी व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपाध्यक्ष सौ. उषाताई गायकवाड, सभापती सौ. पूजाताई शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. रवींद्र खंदारे यांच्यासह बाळकृष्ण तांबारे, लालासाहेब मगर, बशीर तांबोळी, बिभीषण पाटील, पवन सूर्यवंशी, अभय यादव, संतोष भोजने, दीपक हजारे, किशोर पिसे, खुदबुद्दीन शेख, संतोष देशपांडे, प्रशांत माने, विलास कंटेकुरे, अमरसिंह गोरे, विशाल अंधारे, काशिनाथ भालके, बळवंत घोगरे, विकास चव्हाण, बाळासाहेब घेवारे, सविता पांढरे, प्रशांत मिटकरी आदी शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
#धाराशिव
#शिक्षण #जिल्हापरिषद #सेमीइंग्रजी #धाराशिव #QualityEducation #Maharashtra