भूम (जि. धाराशिव) : तालुक्यातील वांगी बु. येथील शेतकरी जेजेराम सुभाष म्हेत्रे यांनी अडीच एकर क्षेत्रात अंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. बाजारभाव कोसळल्यामुळे उभे पीक परवडणारे राहिले नाही. परिणामी त्यांनी कांदा पिकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला.
या लागवडीसाठी सुरुवातीला अंदाजे दीड लाख रुपयांचा खर्च झाला होता. मात्र त्यानंतर फवारणी, खते, औषधे, मजुरी, पाणीपुरवठा तसेच इतर पूरक खर्चाचा विचार केला असता एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव अत्यल्प मिळत असल्याने शेतीतून खर्चही वसूल होणे कठीण झाले.
यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जेजेराम म्हेत्रे यांनी शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. परिसरातील इतर शेतकरीही अशाच परिस्थितीत असल्याचे चित्र आहे.