धाराशिव दि.७ फेब्रुवारी (जिमाका) आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले.यानिमित्ताने नागरिकांमध्ये मतदानाबाबत जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व प्रादेशिक वन विभागामार्फत जिल्ह्यात “हरित मतदान केंद्र” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील शेकापूर प्राथमिक शाळा आणि तुळजापूर तालुक्यातील हंगरगावडी प्राथमिक शाळा येथे हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली.या मतदान केंद्रांवर रोपवाटिकेतील स्थानिक प्रजातींच्या रोपांच्या सहाय्याने परिसर हिरवागार करण्यात आला होता.
पर्यावरणपूरक सजावटीमुळे मतदान केंद्राचा संपूर्ण परिसर आकर्षक व नैसर्गिक वातावरणाने नटलेला दिसून आला.मतदारांमध्ये पर्यावरण संवर्धन व मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या केंद्रांवर विविध माहितीपर फ्लेक्स लावण्यात आले होते.या फ्लेक्सच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे महत्त्व,वृक्षतोडीचे दुष्परिणाम तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.वृक्ष लावा – पर्यावरण वाचवा आणि मतदान करा – लोकशाही बळकट करा असा दुहेरी संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या हरित मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सेल्फी पॉइंटची देखील व्यवस्था करण्यात आली होती.नैसर्गिक वातावरणात मतदान करण्याचा अनुभव घेत मतदारांनी उत्साहाने सेल्फी काढले व या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शेकापूर येथील हरित मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत नागरिकांना वृक्षलागवड व संवर्धनासाठी प्रोत्साहित करण्यात आले.एकूणच,हा “हरित मतदान केंद्र” उपक्रम मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला.पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही कर्तव्य यांचा सुंदर संगम साधण्यात सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाला यश आले.