शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य, पारदर्शक कारभारासह हंगाम 2024/25 चा अंतिम 200 रुपयांचा हफ्ता देण्याची घोषणा
धाराशिव – श्री सिद्धिविनायक परिवारातील तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्रमांक 1 व खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्रमांक 2 या दोन्ही गुळ कारखान्यांच्या गळीत हंगाम 2025-26 या वर्षी उत्साहात प्रारंभ झाला.
रविवार, दि. 10 रोजी या दोन्ही कारखान्यांच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सहकुटुंब धार्मिक पूजा करून पार पडला. या वेळी कुटुंबीयांसह खामसवाडी आणि देवकुरुळी येथील ग्रामस्थ कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील चार-पाच वर्षांपासून या दोन्ही कारखान्यांमार्फत ऊसाचे गाळप होत असून, कारखाना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये श्री सिद्धिविनायक परिवाराबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला आहे.
मागील हंगामात सुमारे सव्वादोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले होते. तर यावर्षी तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप करण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी जलद पेमेंट व्यवस्था ठेवण्यात आली असून, ऊस खरेदी नंतर अवघ्या 15 ते 45 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. तसेच, हंगाम 24-25 मधील उर्वरीत ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता हफ्ता बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.नेहमी पारदर्शक व शेतकरी हिताचा व्यवहार केला जाईल,असा विश्वास दत्ताभाऊंनी व्यक्त केला.यावेळी श्री.दिनेश कुलकर्णी,श्री.गणेश कामटे, श्री.बालाजी कोरे, श्री.राजकुमार जाधव, श्री.अरविंद गोरे, श्री.देविदास कुलकर्णी, श्री.गजानन पाटील, श्री.मंगेश कुलकर्णी, श्री.विकास उबाळे,श्री.अभय शिंदे ,श्री.बालाजी जमाले,श्री.संजीव शिलवंत,श्री.मकरंद ढोबळे यांच्यासह खामसवाडी व देवकुरुळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रतीक देवळे यांनी केले.