Tuljapur
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीजींचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावर राज्य सरकारने मोहर उमटवली आहे. एकूण १,८६५ कोटी रुपयांचा हा भव्य प्रकल्प मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मंजूर केला आहे.आज या विकास आराखड्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाकडून प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने चालू आर्थिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणीही सुरू होणार असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फ़त याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.त्याअंतर्गत मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा,श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देतानाचा १०८ फुटाचा पुतळा, घाटशिळ, महामार्गाजवळील सोलापूर बायपास पट्टयामध्ये व हडको येथे भक्तनिवास, प्रसादालय,पुस्तकालय, भोजनालय, भाविक सुविधा केंद्र,वाहनतळ तयार करणे.वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ६ मे रोजी चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात आली होती. जिल्हाधिकारी धाराशिव यांना त्यासाठी “संनियंत्रण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्प वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
तुळजापूर आणि परिसराचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या महत्वपूर्ण प्रकल्पांतर्गत १०० कोटींपेक्षा अधिक किंमतीचा श्री तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा १०८ फूट उंचीचा पुतळा, ८० कोटींचा रामदरा तलाव सौंदर्यीकरण, ९८ कोटींचे बहुस्तरीय पार्किंग सुविधा केंद्र, तसेच हजारो चौ.मी. क्षेत्रात पायाभूत सुविधांचा समावेश असणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे. तुळजाभवानी देवीजींचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा दृष्टीने या आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षांत म्हणजेच २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच प्राचीन वास्तूंची ऐतिहासिकता अबाधित राखून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच ही सर्व कामे पार पाडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुळजापूर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून अधिक प्रभावीपणे विकसित होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैकपटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या विकास आराखड्यात ३०% तरतुद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, जमिनीचा चांगला मोबदला देण्यात येणार असून आई तुळजाभवानी देवीजींचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रयत्न आहे.