
धाराशिव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ते वैराग रोड या मार्गाचे काम अर्धवट स्थितीतच सुरू असून गटाराचे झाकण न टाकताच काम चालू असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, सदर रस्त्यावर गटारीचे काम पूर्ण न करता व त्या गटारींमध्ये झाकण न घालता अचानकपणे रस्ता तयार करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका, तसेच विद्यार्थी, नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच, वैराग रोडवरील गटारांचे काम व रस्ता मजबुतीकरणाचे काम योग्य पद्धतीने, संपूर्णपणे व वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्ता व गटारीचे काम योग्य प्रकारे न करता गडबडीत उरकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक ५ मे २०२५ रोजी ते दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम योग्यरीत्या आणि अंदाजपत्रकानुसार लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.