धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील गावागावात अधिकाऱ्यांची फौज तयार व्हावी – आमदार कैलास घाडगे-पाटील

Spread the love

झरेगाव येथील विक्रीकर निरीक्षक विठ्ठल तांबे यांचा सत्कार

धाराशिव दि.३१ (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा हा कायम अवर्षणग्रस्त असल्यामुळे हा जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण आपल्याकडे पाण्याचे शाश्वत स्त्रोत नसल्यामुळे उत्पन्नाचे खात्रीशीर कोणतेच साधन नाही. तर शिक्षण हाच एकमेव आपल्यासमोर पर्याय असून जास्तीत जास्त युवकांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी बनावे. पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या गावागावात फौजा निर्माण झालेले आहेत. त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील गावागावात अधिकाऱ्यांची फौज तयार व्हावी असे आवाहन आ. कैलास पाटील यांनी दि.३० डिसेंबर रोजी केले.

धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील विठ्ठल विनायक तांबे या युवकाने वयाच्या २५ व्या वर्षी विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसनी घातली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार आ कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड अक्षय देशपांडे, बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, सोसायटी चेअरमन नागनाथ ढोकळे, विजय तांबे, पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, प्रदीप तांबे, शिवसेना तालुकाप्रमुख सौदागर जगताप, माजी सरपंच अमोल मुळे, रावसाहेब उर्फ पापा तांबे, संजय संकपाळ, भाऊसाहेब तांबे, विकास सोनवणे, अरुण सारफळे व गणेश तांबे व योगेश ढोकळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, मराठवाड्यात कुठलाही उद्योग व एमआयडीसी नाही. त्यामुळे या भागातील अनेक तरुण रोजगारासाठी पुणे, मुंबई व छत्रपती संभाजीनगर या भागात जातात. विशेष म्हणजे अनेक गावांमध्ये समाज मंदिर व सभागृह बांधण्याचा प्रत्येक गावचे नागरिक आग्रह धरतात व ते बांधकाम करून घेतात, मी या विरोधात नाही. परंतू समाज मंदिर व सभागृह बांधण्याऐवजी गावागावात अभ्यासिका बांधण्यासाठी आग्रह धरावा. तसेच अभ्यासिका बांधण्याची मागणी केली तर निश्चितच मलाही त्याचा आनंद वाटेल. जर गावोगावी अभ्यासिका उभा राहिली तर त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच पाठपुरावा करीन असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज उभा करणे सहज शक्य होईल अशी आशा व्यक्त करीत युवक युतीने शिक्षणाची कास धरून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन आपले गाव, तालुका, जिल्हा व पर्यायाने राज्याचे नाव उज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रमोद भोंग यांनी तर उपस्थित आमचे आभार विकास सोनवणे यांनी मानले. यावेळी चंद्रकांत सारफळे, दत्तात्रय सोनवणे, शहाजी तांबे, हनुमंत ढोकळे, ज्ञानेश्वर ढोकळे, मधुकर सोनवणे, शिवाजी ढोकळे, अमोल देशपांडे, बाजीराव ढोकळे, तानाजी ढोकळे ज्ञानेश्वर ढोकळे, शिवाजी ढोकळे, महेश ढोकळे आधी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रमोद भाऊ यांनी तर उपस्थित आमचे आभार विकास सोनवणे यांनी मानले.

यावेळी आ कैलास पाटील, ॲड अक्षय देशपांडे व पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे यांच्या हस्ते विठ्ठल तांबे यांच्यासह स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत असलेले रविराज कदम व मंगेश इंगळे यांचा शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून येथोचित सत्कार करण्यात आला. तर ग्रामस्थ व मित्र परिवाराच्यावतीने देखील सत्कार करण्यात आला. दरम्यान, विठ्ठल तांबे या युवकाने गावातून प्रथमच शासकीय अधिकारी पदाला गवसणी घातल्याबद्दल त्याची गावातून वाजत गाजत व फटाक्याची आतषबाजी करीत जंगी व भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचे औक्षण देखील करण्यात आले. या मिरवणुकीत तरुण, पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!