वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
धाराशिव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच काही पुलांची पडझड झाली असून रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या फळबागा, शेतीपिके तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच विविध संकटांना तोंड देणारा शेतकरी वर्ग या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित महसूल, कृषी व इतर विभागांना तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, पडलेली झाडे व इतर अडथळे दूर करून वाहतूक मार्ग सुरळीत करावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व फळबाग धारकांना शासनाच्या नियमांनुसार त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.