तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामकाजावरून पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांच्या भावनांचा विचार करण्याची व नागरिकात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरिता सांस्कृतिक मंत्री नामदार आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जनसुनावणी घ्यावी अशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मागणी केली आहे.
यापूर्वीच्या आमदारांनी तुळजापूर विकास प्राधिकरण सुरू करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. यात्रेसाठी अनुदान मिळवून दिल्याचे श्रेयही त्यांनाच जाते. मात्र, तुळजाभवानी मंदिराचे उत्पन्न नाही विद्यमान आमदारांनी मात्र हे पाऊल उचलून विकास आराखड्यास चालना दिल्याचे स्पष्ट दिसते.असा उपरोधिक टोला हे यावेळी खासदार ओमराजे यांनी यावेळी लगावला. श्री क्षेत्र तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ असून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असून कुलस्वामिनी तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्याने तुळजाभवानी मंदिराच्या जिर्णोद्धारास विरोध नसल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, राणा पाटील यांनी “तुळजापूरची बदनामी महायुतीने की महाविकास आघाडीने केली” असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावरून त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठकीची मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीच्या पत्रकात पालकमंत्री व खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु नंतर सुधारित पत्र काढून त्यांना दूर ठेवण्यात आले.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुळजापूर विकास प्राधिकरण कडून विकास कामाच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या परंतु केवळ त्या हरकती नोंदवून घेण्यात आल्या तसेच या हरकती वरती कोणतीही जन सुनावणी घेण्यात आली नाही अथवा संबंधितांना
लेखी स्वरूपात कळविले गेले नाही यावर देखील प्रकाश टाकला तुळजापूर विकासाच्या नावाखाली सोंग घेणाऱ्यांचा बुरखा फाडत त्यांनी “पालकमंत्री व लोकप्रतिनिधी हे संवैधानिक पदावर कार्यरत आहेत. ते जनतेमुळेच आहेत, कोणाच्या मर्जीमुळे नाहीत,” असे स्पष्ट करून राजकीय षड्यंत्रकर्ते कोन आहेत ते सप्रमाण दाखवून दिले.
या सर्व घडामोडींमध्ये तुळजापूर शहरातील नागरिक, व्यापारी व पुजारी समाज संभ्रमित झाले आहेत. विकास आराखडा त्यांच्या हितासाठी आहे की राजकीय स्वार्थासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या संभ्रमाचा निकाल लावण्यासाठी तुळजापूर येथे जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
तुळजापूर विकास हा सर्वांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. यात्रेचे धार्मिक व सांस्कृतिक , ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथील विकास आराखडा शाश्वत आणि लोकाभिमुख असणे आवश्यक आहे. मात्र दुसरीकडे बैठकीतून खासदार व पालकमंत्र्यांना वगळणे ही लोकशाही पद्धतीला शोभणारी बाब नाही.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पुजारी यांच्या भावनांचा विचार न करता केवळ कोणा एका व्यक्तीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने निर्णय घेतले गेले तर त्यातून फक्त अविश्वास, नाराजी वाढेल. त्यामुळे आता खरोखरच गरज आहे ती पारदर्शक जनसुनावणीची, ज्यातून सर्व घटकांना आपले मत मांडण्याची संधी मिळेल. विकास हा सामूहिक जबाबदारीचा विषय असून, तो राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकवणे ही तुळजापूरच्या हिताची बाब ठरणार नाही.
यावेळी आमदार कैलास पाटील, ऋषी मगर, राजाभाऊ शेरखाने, महेबुब पटेल, सुधीर कदम याच्या सह पत्रकार बाधव उपस्थील होते