शौर्याची पताका फडकविणाऱ्या भारतीय सेनेच्या समर्थनार्थ शिवसेनेची उद्या तिरंगा रॅली , पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची उपस्थिती

Spread the love

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – आतंकवाद्यांच्या मदतीने भारताच्या सरहद्दीवर आतंकवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याचे काम जिगरबाज व जॉंबाज भारतीय सेनेने केले व करीत आहे. विशेष म्हणजे हवाई, समुद्री व जमिनी असा चौफेर शस्त्रास्त्रांचा मारा करीत नेस्तनाबूत करुन पाकीस्तानाला जबरदस्त धडा शिकविला आहे. तसेच अद्यापही हा चौफेर मारा सुरूच असून भारतीय सेनेच्या पुरुष व महिला जवानांचे मनोधैर्य व त्यांचा आत्मविश्वास वाढावा, देशाची एकता आणि अखंडता कायम अबाधित रहावी यासाठी शिवसेनेच्यावतीने धाराशिव येथे रविवार दि.११ मे रोजी पायी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असून महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण जगामध्ये आतंकवादी देश म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने भारतावर कुरघोडी करण्याचे षडयंत्री धोरण गेल्या अनेक वर्षांपासून अवलंबविलेले आहे. त्यातच दि. २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी आतंकवाद्यांना पुढे करीत पाकिस्तानने जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे पर्यटनसाठी गेलेल्या २६ भारतीय निष्पाप नागरिकांवर अतिशय क्रूर आणि निर्दयपणे गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जॉंबाज भारतीय सेनेने दि.७ मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ‘मिशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानवर जबरदस्त मिसाईल हल्ला चढविला. त्या हल्ल्यात पाकिस्तानची दहशतवादी ठिकाणे बेचिराख केली. तर आजपर्यंत पाकिस्तानच्या निम्म्या भागावर भारतीय सेनेने….न भूतो न भविष्यती मिसाईलचा….वर्षाव करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे भारतीय सेनेने हवाई हल्ल्याबरोबरच समुद्री व जमिनी हल्ले चढवून पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर भारतीय सेनेने ताबा मिळवीत पाकिस्तानची खुमखुमी जिरवली आहे. एवढेच नाहीतर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव नष्ट करण्याचा चंग बांधलेला आहे. भारतीय सेनेच्या अचूक भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची त्रेधात्रिपट उडाली असून पाकिस्तानामध्ये कमालीचा हाहाकार मजला आहे. तसेच रात्रंदिवस भारतीय जवान आपल्या डोळ्यात तेल घालून जीवाची पर्वा न करता भारत देश व देशवासियांचे रक्षण करीत आहेत. त्या सर्व पुरुष व महिला जवानांचे मनोबल व आत्मविश्वास वाढवा यासाठी त्यांना समर्थन देणे आवश्यक आहे. तसेच या जिगरबाज व जॉंबाज सैनिकांनी शौर्य दाखवून भारताची आन-बान शान असलेला तिरंगा पाकिस्तानच्या छाताडावर रोवण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे जॉंबाज भारतीय सेनेच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने रविवार दि.११ मे रोजी सकाळी ९ वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, धाराशिव लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील, दत्ता अण्णा साळुंके व मोहन पणुरे आदींसह पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ही रॅली जिजाऊ चौक (बार्शी नाका) येथून निघून लेडीज क्लब, शहर पोलीस ठाणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी हातामध्ये भारत मातेची प्रतिमा व तिरंगा ध्वज घ्यावा. या रॅलीमध्ये महिला, पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!