

लोहारा (प्रतिनिधी) – लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपयांच्या अतिवृष्टी अनुदानासाठी अद्यापही वाट पाहावी लागत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर काल (29 एप्रिल) धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाने 15 ऑक्टोबर रोजी लोहारा आणि उमरगा तालुक्याचा एकत्रित प्रस्ताव मंत्रालयात पाठवला असून तो आजतागायत प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, इतर जिल्ह्यांचे प्रस्ताव जानेवारी महिन्यात मंजूर झाले असताना लोहारा-उमरग्याचा प्रस्ताव अद्याप मान्य झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला म्हणूनच का हा प्रस्ताव मान्य होत नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लोहारा-उमरगा तालुक्यातील तब्बल 79,886 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपयांचे अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे. या मागणीसाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन झाले.
या आंदोलनाला उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणाताई सलगर, युवा नेते अजिंक्य बाबा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोडकरे, शहराध्यक्ष सलीम शेख, मजूर फेडरेशनचे संचालक पंडित ढोणे, मुकेश सोनकांबळे, संजय लोभे, दत्तात्रय गाडेकर, जगदीश पाटील, शेखर पाटील, नितीन जाधव, शहाजी जाधव, प्रभू राज पनोरे, भरत जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
15 मेपर्यंत अनुदान वाटप न झाल्यास 16 मे रोजी नारंगवाडी (ता. उमरगा) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिल जगताप यांनी दिला आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे

- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन

- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी





