धाराशिव : ( खादिम सय्यद ) कळंब शहरातील बाबानगर भागातील नागरिकांनी दि. 18 एप्रिल रोजी नगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करून कृत्रिम पाणीटंचाई व अस्वच्छ पाणीपुरवठ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील लक्ष्मण हुलजुते यांच्या घरा पासून ते समीर सय्यद यांच्या घरापर्यंत या गल्लीत स्वच्छ पाण्याचा अपुरा व अनियमित पुरवठा केला जात असून काही भागांमध्ये पाणीच येत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
या निवेदनात “17 ते 18 कुटुंबांना दररोज पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, ही समस्या तात्काळ सोडवावी”, अशी मागणी करण्यात आली आहे. याआधी 2 एप्रिल रोजीही याच भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते, मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशीही तक्रार नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर सुधाकर वेदपाठक, शेख वाजेद, इलाही बागवान, वेदपाठक औदुंबर, ईनुस मोमीन, विनोद लांडगे, सय्यद असद, अशोक भिसे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांनी या पाणीटंचाईची कारणमीमांसा करून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी मागणी केली आहे.