धाराशिव – ज्युनियर IAS स्पर्धा परीक्षेतील गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांची हेळसांड
धाराशिव शहरात ज्युनियर IAS स्पर्धा परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मोठे हाल झाले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून ₹450 ते ₹600 फी आकारली गेली असताना देखील व्यवस्थापनाचा अभाव दिसून आला.
छत्रपती हायस्कूलमध्ये 2000 विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांना अशा शाळांमध्ये परीक्षा केंद्र दिले गेले, त्या शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक गोंधळले. काही वेळानंतर सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती हायस्कूलमध्ये बोलावण्यात आले, मात्र त्या ठिकाणीही कुठलेही नियोजन नव्हते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, या गोंधळाशी शाळेचा कोणताही संबंध नाही, परीक्षा घेणारी संस्था जबाबदार आहे.
सहाशे रुपयांपर्यंत फी आकारूनही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. परीक्षेच्या दिवशी योग्य वेळापत्रक नसल्याने विद्यार्थ्यांना दोन-दोन तास फिरावे लागले.
विद्यार्थ्यांनी फी भरूनही त्यांची परीक्षा सुरळीत पार पडली नाही, यामुळे परिक्षा घेणाऱ्या संस्थेने जबाबदारी स्वीकारून उत्तर द्यावे, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. यापुढे अशा परीक्षा आयोजित करताना योग्य नियोजन ठेवले जाईल का, हा मोठा प्रश्न आहे.