कुणबी बाबत हैद्राबादहून आणले महत्त्वाचे दस्तावेज ..
मुख्यमंत्र्यांना बैठक बोलविण्याची विनंती , पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत देखील आढावा बैठक – आ. राणाजगजितसिंह पाटील

Spread the love

धाराशिव, दि. 21: मराठा आरक्षणप्रश्नी महत्वपूर्ण कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातून उपलब्ध झालेल्या दुर्मिळ दस्तऐवजामधून अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून घेतली आहेत. तज्ञांकडून त्याचा सर्वांगाने अभ्यास सुरु आहे. कोणावरही अन्याय न करता मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयायासाठी राज्य सरकारला त्यातून मूलभूत पुरावे उपलब्ध होतील असा विश्वास आहे. मागील सहा दिवसापासून मनोज दादा जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असून याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.  त्यामुळे हैदराबाद गॅझेटचे महत्व विचारात घेऊन जेष्ठ विधीज्ञ, श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची बैठक मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


उपलब्ध झालेल्या दस्ताऐवजात हैद्राबाद गॅझेटीयरसह इतर अनेक कागदपत्रांचाही समावेश आहे. जेष्ठ विधीज्ञ तसेच मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले श्री. मनोज दादा जरांगे-पाटील यांच्याशी संबंधित कायदे सल्लागार यांच्यासह याबाबत आढावा बैठक आयोजीत केल्यास यातून योग्य कायदेशीर मार्ग निघण्यास सहकार्य होईल. त्यानुसार आढावा बैठक आयोजित करण्याची आग्रही विनंती आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
आ. पाटील यांच्या सूचनेनुसार कुणबी नोंदीचे दस्तावेज शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली होती. या समितीमध्ये  उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह, तहसिलदार, मोडी व उर्दू लिपी जाणकार, तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी बुवा यांच्यासह स्थानिक युवकांनाही समाविष्ट करून घेण्यात आले होते. दोन वेळा या समितीने हैदराबाद येथील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातील निजामकालीन कागदपत्रांचा धांडोळा घेऊन अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून आणली आहेत, ज्याचा राज्य सरकारला न्यायालयीन पातळीवर देखील मोठा लाभ होऊ शकतो असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या भेटीतील कागदपत्रे श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत या बाबींचा आढावा घेणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.


तरुण बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये
धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ व पाटोदा येथील शिवाजी निलंगे या युवकांनी  मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नाराजीतून आत्महत्या केली आहे. त्यामुळे मिसाळ आणि निलंगे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. लवकरच आशादायक निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलून कुटुंबातील सदस्यांना दुःखाच्या खाईत लोटू नये, असे नम्र आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!