धाराशिव शहरातून सांजा–सारोळा या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, हा गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या रस्त्यावरून ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक तसेच शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, या मार्गावरील अपघातांमध्ये प्रवाशांचे नाहक बळीही गेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विशेषतः या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वाहतूक होत असल्याने खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची सद्यस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याचे रखडलेले व प्रलंबित काम त्वरित सुरू करावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासोबत धीरज पाटील, धनंजय राऊत, भारत काटे,
विजयवाघमारे,
दिलीपराव भोकरे, सयाजी देशमुख, गुलाबराव गावकरे, सय्यद मन्सूर तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.