येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्री पालखी सोहळा ‘आई राजा उदे उदे… येडासरीचा उदे उदे’च्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मागील १० वर्षांपासून अविरत सुरू असलेली ‘हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी’. या अनुपम सोहळ्यासोबतच, लाखो भाविकांच्या सोयीसाठी येरमाळा देवस्थानला पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर ‘विशेष यात्रा अनुदान’ मिळवून देण्याचा संकल्प आमदार पाटील यांनी केला आहे.
मागील दशकापासून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा जो उपक्रम सुरू केला, तो आता या यात्रेची एक नवी ओळख बनला आहे. पालखी मार्गस्थ होत असताना आकाशातून होणारा फुलांचा वर्षाव पाहून उपस्थित १० ते १५ लाख भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. केवळ उपस्थित राहणेच नव्हे, तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ‘चुनखडी वेचण्याच्या’ विधीमध्ये स्वतः सहभागी होऊन आई येडेश्वरीचे मनोभावे दर्शन घेतले. येरमाळा येथील चैत्र यात्रेला दरवर्षी १० ते १५ लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. सध्या या भव्य यात्रेच्या नियोजनाचा आर्थिक भार ग्रामपंचायतीवर पडतो. भाविकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळा यात्रेला विशेष ‘यात्रा अनुदान’ मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याप्रमाणेच येडेश्वरी देवस्थान विकास आराखडा राबवून या परिसराचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस आहे.विशेष बाब म्हणून शासनाकडून भरीव निधी मिळवून देऊन भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि भक्त निवासाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर आहे. माजी गृहमंत्री तथा जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील साहेब दरवर्षी या पालखी सोहळ्याला न चुकता उपस्थित राहून आपली श्रद्धा अर्पण करत असत. त्यांचाच हा वारसा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अत्यंत निष्ठेने पुढे चालवला आहे. सलग २१ व्या वर्षी त्यांनी आपली उपस्थिती लावून ही कौटुंबिक आणि आध्यात्मिक परंपरा मोठ्या आत्मियतेने जोपासली आहे.
येरमाळ्याचा तीर्थक्षेत्र विकास आरखडा तयार करून कायापालट करण्याचे प्रयत्न : आमदार पाटील
आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होणे हे माझ्यासाठी केवळ कर्तव्य नसून ती एक आत्मिक शक्ती आहे. या परिसराचा विकास आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधांना प्राधान्य देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. येरमाळ्याला तुळजापूर प्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आरखडा करून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ग्रामपंचायतीला असलेली उत्पन्नाचे अत्यल्प साधने पाहता यात्रा अनुदान मिळावे, यासाठीचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे
वाहतूक व्यवस्थापन आणि उपाययोजनाबाबत सूचना
काल झालेल्या पावसामुळे परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रात्री पाऊस झाल्याने अनेक नागरिकांनी आपली वाहने मुख्य रस्त्यावर उभी केली होती.
वाहनांच्या या चुकीच्या पार्किंगमुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना आणि स्थानिक लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांना तातडीने गर्दीचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आगामी काळात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी येरमाळा तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये नवीन उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नागरिकांची सोय व्हावी या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे भविष्यात गर्दीचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.