धाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त संकल्प ते सिद्धी अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी जनता दरबार उपक्रम राबवले जात आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शनात आणि भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात संकल्प ते सिद्धी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात आहे. गावपातळीवरील नागरिकांच्या अडचणींना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे. तुळजापूर, धाराशिव,कळंब, यासह इतर तालुक्यात जनता दरबार घेण्यात येत आहेत. या मालिकेतील ४७ वा जनता दरबार कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे मल्हार पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती जनता दरबार पार पडला. याआधी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पार पडलेल्या दरबारांप्रमाणेच खामसवाडी येथील दरबारातही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले. यामध्ये न्यायालयीन प्रकरणे आणि धोरणात्मक राज्यस्तरीय विषय वगळता, स्थानीय पातळीवरील अनेक समस्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्फत जागेवरच सोडविण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन तक्रारींच्या नोंदी घेण्यात आल्या. आतापर्यंत झालेल्या या ४७ दरबारांत एकूण २ हजार ८७२ तक्रारींची नोंद झाली असून, त्यापैकी २ हजार १४९ तक्रारींवर कार्यवाही करून नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. तर उर्वरित तक्रारी संबंधित विभागांमार्फत निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. खामसवाडी येथील दरबारात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, संजय पाटील, तसेच कळंब तालुक्यातील मंडळाध्यक्ष अरुण चौधरी, दत्ता साळुंखे, वैभव मुंडे, महिला मोर्चा पदाधिकारी छाया बोंदर, माणिक बोंदर, किरण पाटील, तसेच भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमास गावागावात थेट संवाद व तक्रार निवारण ही या दरबारांची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत. त्यामुळे भाजपच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.