धाराशिव दि.५ मार्च ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी,१२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधांसाठी भोजन भत्ता,निवास भत्ता,निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक मदत दिली जाते.
विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र आणि ऑनलाइन अर्ज करताना उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे.त्यामुळे योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धाराशिव नगरपालिका तसेच सर्व तालुका नगरपालिका/नगरपरिषद हद्दीतील महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी ज्यांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही,त्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन १५ मार्च २०२५ पूर्वी अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव यांनी केले आहे.