कौतुकास्पद । झारखंडमध्ये कार्यरत बार्शीपुत्र आयएएस अधिकारी रमेश_घोलप यांनी शेतकऱ्यांसाठी दिले तीन महिन्यांचे वेतन
५ लाखांची मदत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये सुपूर्द
सोलापूर (प्रतिनिधी) – बार्शी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी आणि सध्या झारखंड राज्यात सेवेत असलेले आयएएस अधिकारी श्री. रमेश घोलप यांनी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतःच्या तीन महिन्यांच्या पगारातून एकूण पाच लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाअंतर्गत त्यांनी प्रथम टप्प्यात बार्शी तालुक्यातील कारी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि दहीटणे गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा–मुलीच्या शैक्षणिक सहाय्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली. श्री. रमेश घोलप आणि त्यांच्या पत्नी रुपाली घोलप यांनी हे धनादेश स्वतः जाऊन संबंधित कुटुंबांना सुपूर्द केले.
संघर्षातून उभा राहिलेला संवेदनशील अधिकारी – लोकाभिमुख कार्यपद्धती
गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी बनलेले रमेश घोलप यांचा प्रवास स्वतः संघर्षमय राहिला आहे. सध्या ते झारखंड राज्याच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव आणि जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. झारखंडमध्ये सेवेत असताना त्यांनी मानवी संवेदनशीलतेने अनेक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक बांधिलकी, गरजूंप्रती सहानुभूती आणि थेट लोकांमध्ये जाऊन कार्य करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे झारखंडमधील स्थानिक जनतेत ‘गरीबांचा कलेक्टर’ म्हणून त्यांची ओळख आहे.