प्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशीव यांचे निधन

Spread the love

लातूर :
प्रसिद्ध कथाकार, ग्रामीण साहित्य चळवळीतील महत्त्वपूर्ण साक्षीदार प्रा. भास्कर चंदनशीव (वय 80) यांचे आज लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

प्रा. चंदनशीव यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात तसेच बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. निवृत्तीनंतर ते आपल्या गावी कळंब येथे स्थायिक झाले होते.

ग्रामीण समाजातील वास्तव, स्थित्यंतरे आणि संघर्षाचे जिवंत चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा वाङ्मयाला नवे भान देणाऱ्या ठरल्या. त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह, ललित लेखन, समीक्षा व संपादन असे उल्लेखनीय साहित्य कार्य आहे. अलीकडच्या काळात ते आजारी असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहात होते.

डॉ. केदार काळवणे यांनी त्यांच्या साहित्यावर आधारित ‘गौरव ग्रंथ’ संपादित केला असून त्याच्या प्रकाशन सोहळ्याची तयारी सुरू होती. मात्र त्यांच्या निधनामुळे हा सोहळा न होऊ शकणे ही साहित्यविश्वासाठी हानीकारक बाब ठरली आहे.

प्रा. भास्कर चंदनशीव हे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. मराठी साहित्यात मौलिक भर घालणारे तसेच ग्रामीण साहित्यात विद्रोही आणि व्यापक भूमिका मांडणारे साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला अपरिमित हानी झाली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!